Tuesday, February 26, 2013

माझा मराठीची बोलू कौतुके।


माझा मराठीची बोलू कौतुके। 
परि अमृतातेहि पैजासी जिंके। 
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे. 

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी  

कविश्रेष्ठ कुसूमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी  सर्व जगभर मराठी बांधवाकडून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा जगभरातील सुमारे नऊ कोटी लोकांची मातृभाषा आहे.अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या ग्रंथात,शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो.सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात(अंदाजे इ.स.पू.२२०-इ.स.२१८)मराठी भाषेची साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.सतरावा सातवाहन राजा हाल याचे "गाथासप्तशती" हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठी साहित्याला मोठी देणगी आहे.

देवगिरीच्या यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.याच कालखंडात मुकुंदराजनी विवेकसिंधु(शके १११०) या काव्य ग्रंथाची,तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी(शके १२१२) या ग्रंथाची रचना केली.

मराठी भाषा वाढविण्याचे खरे श्रेय छत्रपती शिवरायांना आहे.त्यांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.वारकरी संप्रदाय,महानुभाव संप्रदाय आदि अनेक संप्रदायांनी मराठी साहित्यात आपल्या भक्तीपर काव्याची मोलाची भर घातली आहे.

विसाव्या,एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न चालू केले आहेत त्याबद्दल शासनाचे आभार.पण सर्वसामान्य मराठी जनांनी आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला तर या भाषेच्या प्रसारात मदत होईल.इंग्रजीऐवजी मराठी बोलल्याने ज्यांना कमीपणा वाटतो ते मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतात.आपली मातृभाषाच सर्व भाषेमध्ये श्रेष्ठ असते.आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठविणे आजकालच्या पालकांना कमीपणाचे वाटते.आपणच आपल्या भाषेबद्दल असा दुजाभाव ठेवला तर इतरांनी मराठीचे कौतुक गावे असे आपण कोणत्या तोंडानी म्हणावे.?



           

7 comments:

  1. खरंतर मराठी भाषा बोलायला काही सुशिक्षित लोकांना लाज वाटते हीच खूप मोठी शोकांतिका आहे......

    ReplyDelete