पावनखिंडीच्या
एकदिवसीय मोहिमेचे उत्सुकता
एक महिन्यापासून डोक्यात
होती.पन्हाळा ते
पावनखिंड हे अंतर अंदाजे 55
ते 60 कि.मी.
असल्यामुळे एका दिवसाची
ही मोहिम पूर्ण करू शकेन याबद्दल
मी स्वत:च साशंक
होतो.डॉ.अमर
आडके,बी.बी.पाटील,हणमंतराव
नलावडे,विद्याधर
दुर्गूळे,दिपक
सावेकर आदि कसलेल्या शिलेदारांच्या
मार्गदर्शनाखाली ही मोहिम
होणार होती,त्यामुळे
थोडासा निर्धास्तपण होतो.
मोहिमेची
पूर्वतयारी म्हणून शूज,खाण्याचे
पदार्थ तसेच मोहिमेदरम्यान
येणाऱ्या गावातील लहान मुलांना
वाटण्यासाठी बिस्किटे,चॉकलेट
आदि पदार्थ सोबत घेतले.
|
मोहिमेची सुरूवात,बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशिद यांच्या पुतळ्यास वंदन करून झाली |
पहाटे
साडेतीन वाजता गंगावेश(कोल्हापूर)येथे
सर्वांना जमा होण्यास सांगितले
होते.मोहिमेचा
विचार करतच मी रात्री झोपी
गेलो.झोपताना वाटून
गेले की पहाटे लवकर उठलो नाही
तर मोहिमस जाता येणार नाही.पण
मनात प्रामाणिक इच्छा असेल
तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू
शकता.मला तीन
वाजण्याच्या अगोदरच जाग आली.मी
सामानाची आवराआवर करून
गंगावेसकडे निघालो.
|
जंगलातून वाटचाल |
गंगावेसला
अगोदरच बरेच मावळे आले होते.चार
वाजता सर्वजण पन्हाळ्याकडे
निघाले.पाच वाजण्याच्या
सुमारास वीर शिवा काशीद तसेच
बाजीप्रभूच्या पुतळ्यास
वंदना करून सर्वजण राजदिंडीमार्गे
विशाळगडाच्या मार्गाकडे
निघाले.याच मार्गावरून
छत्रपती शिवाजीराजे सिद्दी
जौहरच्या तावडीतून निसटून
विशाळगडाकडे गेले होते.आज
आम्ही सर्वजण त्याच मार्गाने
पावनखिंडीकडे चाललो
होतो.सुरूवातीच्या
काही मिनिटातच पावनखिंडीच्या
मोहिमेतील अवघडपणा लक्षात
आला.पहाटेची वेळ
असल्यामुळे प्रकाश थोडासा
अंधूकसा होता त्यामुळे
सर्वजणांनी विजेऱ्यांचा आधार
घेत मार्गक्रमण करण्यास
सुरूवात केली.
|
अंधारातून मार्गक्रमण |
साडेतीनशे
वर्षापूर्वी बारा जुलैच्या
रात्री याच मार्गाने मशालींचा
वापर करून छत्रपती कसे निसटले
असतील असा विचार मनी करत मी
मार्गक्रमण करत होतो.छत्रपती
वेढ्यातून निसटले ती रात्र
पोर्णिमेची होती.मुसळधार
पाऊस,ढगाळ हवामान,घनदाट
जंगल याशिवाय सिद्दीच्या
सैनिकांचा पाठलाग अशा परिस्थितीत
आपल्या लाडक्या राजाला
विशाळगडाला पोहचविणे मावळ्यांना
किती जिकिरीचे होते हे पावनखिंडीचा
मार्गाने जाताना हळूहळू कळू
लागले.
|
थोडीसी विश्रांती |
राजदिंडीतून खाली उतरून तुरूकवाडी,म्हाळूंगे पार करून आम्ही मसाई पठार चढू लागलो.मार्गावर मोठमोठाले दगड,निसरडा रस्ता,सोबत पावसाची
साथ यामुळे सर्व मावळ्यांची
पुरती दमछाक होऊन गेली.मसाई
पठारावर पोहचल्यावर थोडासा
आराम करून आम्ही पठार चालू
लागलो.मसाई पठार
म्हणजे जणू काही सह्याद्रीचे
छप्पर आहे.
अंदाजे दहा ते बारा कि.मी. लांब असणाऱ्या विशाल अशा पठारवरून दिसणारे पन्हाळ्याचे सुंदर रूप डोळ्यात साठवून सर्व मावळ्यांनी मसाई पठार पार केले.
मसाई पठारानंतर कुंभारवाडी, चाफेवाडी, मांडलाईवाडीचा
टप्पा पार करून सर्वांनी
न्याहारी घेऊन थोडासा आराम केला. पावसाळ्यात
या परिसराचे सौंदर्य अगदी
खुलून गेलेले असते. डोंगरउतारावरील
भातशेती, हिरवीगार
वनराई, गर्द झाडी,धबधबे
जंगलातून गेलेली पायवाट जणून
काही सृष्टीच्या चित्रकारांने
आपले सर्व रंग उधळले आहेत.
|
मुलांना खाऊ वाटप |
वाटेत ठिकठिकाणी लहान मुलांना खाऊचे वाटप करत मावळ्यांचे मार्गक्रमण चालू होते. मोहिमेदरम्यान येणाऱ्या ओढ्यात आंधोळ करून ताजेतवाने होऊन सर्वजण परत नव्या जोमाने चालू लागले.मांडलाईवाडीनंतर करपेवाडी, आंबेवाडी,
कळकेवाडी, पाटेवाडी, सुक्यामाचा माळ,मासावडे करत सर्वजण पांढरेपाणी या ठिकाणी पोहचलो. पांढरेपाणी ते पावनखिंड हे अंतर अंदाजे सात कि.मी. आहे.
पावनखिंडीत पोहचल्यावर शिवरायांची वंदना करून,धारातीर्थी पडलेल्या सर्व पराक्रमी मावळ्यास वंदन करून पुढील वर्षी परत येणाचा निर्धार करून मोहिमेची सांगता झाली.कोल्हापूर, पुणे,नाशिक,मुंबई आदि ठिकाणाहून अंदाजे दिडशे मावळे या मोहिमेत सहभागी झाले होते.
इतिहासात
प्रसिध्द असणाऱ्या पावनखिंडीच्या
युध्दाची सुरूवात पांढरेपाणी
या ठिकाणाहून झाली होती व शेवट
पावनखिंडीत झाला.बाजीप्रभू, फुलाजीप्रभू, हैबतराव शिळीमकर, रायाजी बांदल आदि पराक्रमी मावळ्यांनी जिवाची बाजी लावून खिंड लढविली.सतत बारा तास चालून दमलेल्या तीनशे मराठ्यांनी
थकून न जाता आदिलशाहच्या विशाल
अशा सेनेबरोबर नऊ तास झुंजून
खिंड रोखून धरली त्यामुळे
छत्रपती शिवरायांना विशाळगडाकडे
जाण्यास अवधी मिळाला.
|
मोहिमेची सांगता |
बाजींच्या
देहाची चाळण झाली असतासुध्दा
त्यांचे कान विशाळगडाकडे
लागले होते,कारण
महाराज विशाळगडावर पोहचल्यानंतर
तोफेची सलामी होणार होती.इकडे
विशाळगडावर आदिलशाहच्या
सरदारांचा वेढा लागला होता.तो
वेढा तोडून महाराज विशाळगडावर
पोहचले आणि तोफेची सलामी झाली.
तोफेचा
आवाज ऐकल्यानंतर बाजींनी
आपले प्राण सोडले,घोडखिंड
कायमची इतिहासात पावन
झाली.पावनखिंडीतल्या
या रणसंग्रामात सर्वच्या
सर्व तीनशे मावळे मारले गेले.
धन्य
ते वीर ,धन्य ती
त्यांची स्वराज्यनिष्ठा