Monday, December 19, 2011

दिल्लीच्या तख्तावर परत एकदा मराठ्यांनी चाल करून जाण्याची वेळ आली आहे.

गेल्याच आठवड्यामध्ये कर्नाटक सरकारने बेळगाव महानगरपालिका विर्सजीत केली.सीमाभागातील मराठी बांधवावर गेली पन्नास वर्ष अत्याचार होत आहे.पण प्रत्येक वेळी केंद्रातील सरकारने आपले हित जोपासत विलीनीकरणाचा विषय लांबविला.

सीमाभागातील मराठी जनतेची परिस्थिती मोठी बिकट आहे.त्यांना धड कर्नाटकात नोकरी मिळते ना महाराष्ट्रात मिळते.मराठी तरूणांना खोट्या गुन्ह्याखाली तुरूंगात अडकवून कर्नाटक सरकार त्यांचा छळवाद मांडते.महाराष्ट्र सरकारने सीमाभाग केंद्रशासित करावा म्हणून ठराव केला पण नुसता ठराव करून काहीच होणार नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दिल्लीत महाराष्ट्रातील लाखो लोकांनी विशाल मोर्चा काढून सरकारला आपली ताकद दाखविली पाहिजे.दिल्लीच्या तख्तावर परत एकदा मराठ्यांनी चालून जाण्याची वेळ आली आहे.

सीमाभागातील दोन पिढ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला,आता तिसरी पिढी जन्माला आली आहे,त्यांच्या भवितव्यासाठी तमाम मराठी जनांनी एक होण्याची वेळ आली आहे.
इतिहास सांगतो जेव्हा मराठी एक झाले तेव्हा त्यांनी दिल्ली काबीज केली.मराठी जनांनी एकत्र येवून हा लढा अधिक तीव्र केला तरच बेळगाव,कारवार,निपाणी,हुबळीसह संयुक्त महाराष्ट्र होऊ शकतो....
यावेळी मला कवीवर्य राजा बढे यांच्या पंक्ती आठवितात.

                   काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी,
                   पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी,
                   दरिद्र्याच्या उन्हात शिजला,
                   निढळाच्या घामाने भिजला,
                   देशगौरवासाठी झिजला,
                   दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा ।।            
 

Thursday, November 3, 2011

टीम अण्णांचे भरकटत चाललेले आंदोलन

भष्ट्राचार विरूध्दच्या अण्णांच्या आंदोलनात सारा देश स्वंयस्फुर्तीने एकत्र आला.स्वातंत्र्यलढ्यानंतर सर्वाधिक लोकांनी भाग घेतलेले हे मोठे जनआंदोलन होते.

या आंदोलनाला मिळालेल्या यशाने या टीममधील इतर लोक सध्या भरकटून गेले आहे.किरण बेदी,केजरीवाल,प्रशांत भूषण ही मंडळी त्यापैकीच एक होत.

या प्रत्येक मंडळीच्या सामाजिक संस्था(N.G.O.)आहेत.या मंडळीच्या एकंदरीत वर्तनावरून आपल्या संस्थेला या आंदालनाचा किती फायदा होईल यावर ही मंडळी सध्या लक्ष देत आहेत.सोशल मिडियामध्ये वेगवेगळी वक्तव्ये करून या मंडळीनी आंदोलनाची धार बोथट करून टाकली आहे.

टीम अण्णांमधील या मंडळीना आपल्या कार्यपध्दतीत सुधारणा केली नाही तर भष्ट्राचारविरूध्दच्या जनआंदोलनाची स्थिती समुद्राच्या वादळात भरकटलेल्या जहाजासारखी होण्यास वेळ लागणार नाही.    

Tuesday, October 18, 2011

भारतातील तथाकथित मुर्ख बुध्दिवादी

आजकाल लोकांना थोडी प्रसिध्दि मिळाली की व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही ओकायला ते  सुरूवात करतात.भारतातील काही तथाकथीत समाजसेवी मंडळी आहेत जे समाजसेवेच्या नावाखाली(N.G.O)आपले दुकान चालवतात.एखादा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला की यांना गगण ठेंगणे वाटू लागते.भारतात आपणच बुध्दिवादी आहोत हा मुर्ख भ्रम मनात ठेवून भारताच्या सार्वभौमत्वाला,आंतरराष्ट्रीय हिताला बाधा पोहचणारी विधाने ते करतात.

काश्मीर प्रश्न,पूर्वेकडील प्रश्न,नक्षली चळवळी यांच्याबदल या लोकांना खूप कळवळा आहे.आंतरराष्ट्रीय संस्था या लोकांना मदत करून यांचा वापर भारतविरोधी कारवायाकरिता करतात.  

या मुर्ख लोकांना महत्व देऊन आपली मिडिया त्यांना आणखी मोठे बनविते.या तथाकथित समाजसेवी लोकांना आपण आता किती महत्व द्यावयाचे हे ठरविण्याची वेळ आता आजच्या पिढीवर आली आहे.आपण वेळीच या लोकांपासून सावध झालो नाही,तर ही कीड संपुर्ण भारतात पसरायला वेळ लागणार नाही.

Sunday, September 11, 2011

होय,मला बदल हवा आहे.

विशाल अशा खंडप्राय भारत देशात आजकाल फुटीरतेचे वारे वाहू लागले आहेत.प्राचीन कालखंडात जगातील सर्वात सुखी व संपन्न मुलूख असलेल्या आपल्या देशाची आजची अवस्था अत्यंत विदारक अशी बनली आहे.

बांग्लादेशी,पाकिस्तानी घुसखोर देशाच्या विविध भागात अगदी आरामात राहत आहेत.मताच्या राजकारणासाठी मतलबी राजकीय पक्षांनी त्यांना रेशनकार्डासह सर्व सुविधा पुरविल्या आहेत.याच लोकांना हाताशी धरून परकीय आतंकवादी संघटना देशभरात उच्छाद मांडत आहेत.पुर्वेकडील राज्यामध्ये बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर आहे,त्यातच चीन सारखे साम्राज्यवादी देश सीमेभोवती आपला पाश आवळत आहेत.पण कुणाला याची फीकिर आहे?.

भारतीय मिडिया क्रिकेट,बॉलिवुड किंवा एखाद्य़ा राजकारण्याची बातमी देण्यात धन्यता बाळगत आहे.
काही लोक सोडले तर बहुतेक  राजकारणी गेंड्याची कातडी पांघरून फक्त आपला व आपल्या पुढील पिढीचा विचार करत आहेत.मनाला वाटते हे कधी बदलणार आहे की नाही,आपल्या देशाला पुर्वी सारखे वैभव प्राप्त होणार आहे की नाही?.

आज भष्ट्राचार,आतंकवादी हल्ले,गरिबी या मुद्यांनी देश होरपळून गेला आहे.भारतमाता आजच्या तरूण युवकांकडे मोठ्या आशेने पाहात आहे कारण उद्या तेच बदल घडविणार आहेत. .........

Thursday, August 25, 2011

छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजें यांचे निष्ठावंत मुस्लिम सेनानी

छत्रपती शिवरायांचा लढा मुस्लीम धर्माविरूध्द नसून जुलमी इस्लामी राजसत्तेशी होता,दुर्दैवाने आज शिवरायांच्या नावाचा वापर हिंदू-मुस्लीम असे दंगे घडविण्यासाठी होतो.आपण सर्वांनी खरा इतिहास समजून घेतला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते.छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला पण त्याची समाधीही प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली.काही अतिविद्वान इतिहासकारांनी,ज्यांनी आपल्या इतिहास लेखनात संभाजीराजेंची बदनामी केली,अशा इतिहासकारांनी संभाजीराजेंच्या मृत्युचे भांडवल करून संभाजीराजेंनी हिंदू धर्मासाठी प्राण सोडिला असे लिहून संभाजीराजेंना धर्मवीर ठरविले.ज्याला इतिहासात कोणताही पुरावा नाही.वास्तविक छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्यासाठी बलिदान केले होते.छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजें यांना धर्माच्या बंधनात अडकवून काही राजकारणी मंडळी व इतिहासकार त्यांचे महत्व कमी करत आहेत.आज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लढ्यात छत्रपती शिवरायांचे नाव वापरून ही मंडळी छत्रपतींना महाराष्ट्रात बंदिस्त करू पाहात आहेत,या मंडळीना माहीत नाही की कर्नाटक ही मराठ्यांची जहागीर होती.छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजीराजें यांच्या सैन्यात अनेक निष्ठावंत मुस्लीम सैनिक होते,याची माहिती आपण पुढे सविस्तरपणे घेणार आहोत.

छत्रपतींच्या जीवाला जीव देणारे अनेक मुस्लिम सरदार स्वराज्यात होते.नूरखान बेग हा पायदळाचा प्रमुख होता.सिद्दी अंबर वहाब हवालदार याने(जुलै १६४७)मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला.सिद्दी इब्राहिम हा छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता,अफजलखानाच्या भेटीच्या वेळी तो छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक होता(१९ नोव्हेंबर १६५९),फोंड्याचा लढाईवेळी त्याने पराक्रम गाजविला(एप्रिल १६७५)आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.सिद्दी हिलाल हा घोडदळात अधिकारी होता,पन्हाळगडाच्या वेढ्यात(२ मार्च १६६०)त्याने शिवरायांच्या सुटकेसाठी मोठा पराक्रम गाजविला,तसेच उमराणीजवळ बहलोल खानाविरूध्द झालेल्या लढाईत(१५ एप्रिल १६७३)तो होता.नेसरीजवळ बहलोल खानाशी झालेल्या युध्दात प्रतापराव गुजराबरोबर मारल्या गेलेल्या सात वीरात सिद्दी हिलाल होता.

सिद्दी वाहवाह(सिद्दी हिलालचा पुत्र)हा घोडदळातील सरदार होता,पन्हाळगडाला सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत तो जखमी झाला(दि.२ मार्च १६६०).मदारी मेहतर हा छत्रपतींचा विश्वासू सेवक होता.आग्र्याच्या बंदोबस्तातून महाराजांना सुटतेवेळी याची मोठी मदत झाली(१७ ऑगस्ट १६६६).काझी हैदर हा छत्रपती शिवरायांचा वकील होता(सन १६७०-१६७३).हुसेनखान मियाना याने मसौदखानाच्या कर्नाटकातील प्रांतावर हल्ला करून बिळगी, जामखिंड, धारवाड आदि प्रांत जिंकला(मार्च १६७९).रुस्तमेजनमा हा महाराजांना विजापूर दरबाराच्या गुप्त बातम्या पाठवण्याचे काम करीत असे,हुबळीच्या लुटीच्या वेळी त्याने मोठी कामगिरी पार पाडली(६ जानेवारी १६६५).दर्यासारंग हा मराठी आरमाराचा पहिला सुभेदार होता.त्याने मायनाक भंडारीसोबत खांदेरीवर(सन १६७९)विजय मिळवला.तर संभाजीराजेच्या कालात बसनूर(जानेवारी-फेब्रुवारी १६८५) लुटले. दौलतखान, इब्राहीम खान,सिद्दी मिस्त्री या आरमारातील अधिकार्‍याने खांदेरी(१६७९) आणिसंभाजीराजेंच्या बसनूरच्या(जानेवारी-फेब्रुवारी १६८५)मोहिमेत मोठा पराक्रम केला.सुलतान खान हा सुभेदार पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला होता.इब्राहिम खान हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.त्या काळात तोफखान्यातील सर्व गोलंदाज (तोफची) मुस्लीम होते.विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेल्या ७०० पठाणी पायदळ आणि घोडदळाने स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली.

छत्रपतीच्या काळात असे अनेक निष्ठावंत मुस्लीम सैनिक होते ज्याची माहिती आपणास ज्ञात नाही.हे लिहिण्याचे प्रयोजन एवढ्याचसाठी की आपण छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजेंना धर्माच्या बंधनात,भाषेच्या बंधनात अडकवून,या राष्ट्रपुरूषांचे महत्व कमी करू नये.छत्रपतींचे विचार आपण आचरणात आणावेत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा करू नये.

Monday, June 13, 2011

राष्टकुल,आदर्श,स्पेक्टम घोटाळा व मीडियाचा प्रामाणिकपणा

सन 2010-11 हे  घोटाळ्याचे वर्ष म्हणून भारतीय इतिहासात गणले जाईल. पहिला काही हजार कोटीचा राष्ट्रकूल घोटाळा उघडकीस आला.इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडियामध्ये या घटनेबद्दल वार्तालाप चालू झाला.ही घटना संपण्यापूर्वीच आदर्श घोटाळा उघडकीस आला,ज्यामध्ये सैनिकांच्या कुटूंबियासाठी साठी राखीव असलेल्या भूखंडावर राजकारणी व सरकारी बाबूंनी संगतमताने डल्ला मारला.हा विषय मीडियामध्ये चघळला जात असताना लाखो कोटी रूपयांचा स्पेक्टम घोटाळा उघडकीस आलो.पहिले दोन विषय बाजूला पडले मीडिया याच विषयावर बोलू लागले.

लोकसुध्दा काही दिवस या घोटाळ्यांची गोष्टीची चर्चा करतात व नंतर विसरून जातात.भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडिया प्रामाणिक काम कधी करणार हाच मोठा प्रश्न आहे.
  
देशामध्ये सध्या नक्षली धूमाकुळ घालत आहेत.शेकडो पोलिसांचे बळी गेले आहेत याकडे मीडियाचे लक्ष नसते.चीन आपले साम्राज्यवादी पंख पसरत आहे,पाकिस्तान सतत कुरापत काढत असतो.पूर्वेकडे बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.या महत्वाच्या विषयी चर्चा करण्याऐवजी भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडियातील काही लोक पैसे घेऊन काम करतात(पेड न्युज)तसेच टी.आर.पी वाढावा यासाठी आपणांस हव्या तश्या बातम्या देतात.

देश्याच्या मुख्य प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी भारतीय इलेक्टॉनिक्स आणि प्रिंट मीडिया आज पुर्णपणे भरकटला आहे आणि यापेक्षा मोठे दुदैव ते कोणते. 

Thursday, May 19, 2011

रायगडची चढाई (एक विस्मरणीय अनुभव)

रायगडाला जाण्यासाठी पुण्यातून आम्ही सकाळी निघालो.पण सुरूवातच अडचणीने झाली.मी,चेतन,संकेत,राम,मयुर,योगेश अंगडी, योगेश कुलकर्णी,सुहास,सुशील असे आम्ही नऊ जण होतो आणि गाडी छोटी होती.शेवटी ड्रायव्हरने एक टाटा सुमो मागवली ऊपर आम्हास सांगितले की गाडी नवीन आहे.आम्ही सर्वजण छोट्या गाडीतून चांदणी चौकात आलो.नऊ वाजून गेले तरी गाडीचा पत्ता नाही.शेवटी गाडी आली,पण गाडी बघितल्यावर सर्वांनाच डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली.टाटा सुमो गाडी जूनी खटारा होती,गाडीच्या सिट फाटलेल्या होत्या.गाडीमध्ये म्युझिक सिस्टिमची सोय नव्हती.पण आता वेळ निघून गेलेली होती.रायगडाला जावयाचे म्हणून आम्ही लोकांनी भरपूर खरेदी केली होती.शेवटी आम्ही खटारा टाटा सुमो मधून रायगडाला जावयाचा निर्णय घेतला.

क्षणभर विश्रांती
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ,वाटेत थांबत-थांबत आमचा प्रवास चालू होता.वाटेत एका  जलाशयाजवळ थांबून मस्तपैकी गरमा-गरम भजी खाल्ली.कोल्हापूरचा म्हणून सर्वांनी मला मिरची खाण्याचा आग्रह केला,मी पण जरा जास्तच मोठे पणा दाखवून तीन-चार मिरच्या खाल्ल्या पण नंतर माझी अवस्था पाहण्यासारखी झाली.थोडीशी पेटपूजा झाल्यानंतर आमचा प्रवास परत चालू झाला.ताम्हीनी घाटामध्ये धबधब्या खाली सर्वांनी आंघोळ करून घेतली.नंतर वाटेत माणगावला सर्वांनी मस्तपैकी जेवण घेतले.असे करत शेवटी आम्ही महाड मार्गे रायगडाच्या पायथ्याला सायंकाळी पाच वाजता पोहचलो.रायगडावर चालत जावयाचे व येताना रोपवेने यावयाचे असे आमचे ठरले.रायगडाच्या चढाईला सुरूवात करताना मुसळधार पावसाने व दाट धुक्याने आमचे स्वागत केले.हर हर महादेव,छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणून आम्ही चढाई आरंभिली.छत्रपतींचे नाव घेतल्यावर सर्वांच्या अंगात वीरश्री संचारली होती.                                                          


चढाईला सुरूवात
शिवरायांना वंदन करून आम्ही सर्वांनी सुरूवात केली.थोडेसे अंतर पार केल्यावर रायगडाच्या  बुलंदपणा लक्षात येऊ लागला.एका बाजूस खोल दरी तर दुस-या  बाजूस उंच अशी  डोंगराची भिंत, वर जाण्यासाठी असलेल्या दगडी मजबूत पाय-या सारेच काही औरच होते.दाट धुके तसेच मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे वाट खूपच निसरडी झाली होती.मी दोन वेळा घसरून पडलो.छत्रपतींच्या नावाचा जयघोष करत आम्ही मावळे मार्गक्रमण करत होतो.वाटेत अनेक ठिकाणी आम्हांस धबधबे पाहावयास मिळाले.रायगडाच्या बुलंद व अजिंक्य असणा-या कड्यावरून फेसाळत पडणा-या धबधब्याचे सौंदर्य केवळ अर्वणीय असे होते.कोसळणा-या जलधारेमध्ये स्नान करण्याचा मोह परत एकदा सर्वांना झाला.आंघोळीनंतर एका आडोशाला बसून आम्ही सर्वांनी सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाऊन थोडीशी विश्रांती घेऊन परत एकदा चढाई चालू केली.या चढाईचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे आमच्या सोबत एक कुत्रा पायथ्यापासून आला होता,त्याचे नाव मयुरने शेरू असे ठेवले होते.त्याला आम्ही सोबतचे खाद्यपदार्थ खावयास दिले.शेरू रायगड किल्याच्या तटापर्यंत आमच्या सोबत होता जणू काही आम्हास रायगडाचा रस्ता दाखवत होता.      


तटबंदीवरून कोसळणारे धबधबे
सायंकाळचे साडेसहा वाजून गेले होते.वाटेतील फेसाळणारे धबधबे,हिरवेगार डोंगर,दुरून दिसणारा रायगडाचा मुख्य दरवाजा सारेच आम्हास खुणावत होते.रायगडाने आम्हांस अशी मोहिनी घातली होती की रायगडाचे प्रत्येक रूप साठवत आम्ही डोळ्यात साठवत होते.किती वेळ झाला याची कुणास फिकिर नव्हती. अखेरीस तो क्षण जवळ आला आणि आम्हास दोन प्रचंड अशा बुलंद दरवाज्याचे दर्शन झाले. हाच तो दरवाजा ज्याने शत्रूच्या आक्रमणाशी मुकाबला करून मराठ्यांच्या राजधानीचे रक्षण केले.हिरोजी इंदूलकर या शिवरायांच्या स्थापत्यकाराने खरोखर अजिंक्य असा पहाड किल्ल्याच्या प्रवेशदारी  उभा केला होता. याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य ,दाट धुक्यात न्हाऊन निघालेल्या या 
महादरवाज्याचे दर्शन
दरवाज्याजवळ आम्ही सर्वजण वेड्यासारखे कितीतरी वेळ बसून होते.पाऊसामुळे  सर्वजण नखशिखांत भिजलो होतो.पण कुणाला याची पर्वा नव्हती,छत्रपतींचा जयजयकार करीत आम्ही मुख्य दरवाज्यातून आत प्रवेश केला, त्या आवाजाच्या प्रतिध्वनीने आमच्या सर्वांच्या भिजलेल्या शरीरावर सुध्दा काटा आणला.तो क्षण आजही विसरू शकत नाही.विचार केला,याच दरवाज्याजवळ कित्येक लढाया झाल्या व   छत्रपतींचे आगमन  रायगडावर याच मार्गे येत होते.

तटबंदीवर मावळ्यांची विश्रांती
दरवाज्यातून वर आल्यानंतर सर्वांनी एका झोपडीवजा हॉटेलमध्ये गरमागरम चहा घेतला व छोटेसे ताजतवाने झालो.नंतर बराच वेळ रायगडाच्या कट्टावरून बसून आम्ही रायगडाला डोळ्यात साठवत होतो.सायंकाळचे सातेसात वाजून गेले होते,अंधार वेगाने पडत होता वर दाट धुके,सोबतीला मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा आम्ही लवकरात लवकर गेस्ट   रूम मध्ये पोहचण्याचा विचार केला.पण वेळ   
लवकर जात होती.आम्ही होळीचा माळ या परिसरात पोहचलो.होळीचा माळ परिसरात असलेला छत्रपतींचा पुतळा अंधुकसा दिसत होता.सर्वजण रायगड रोपवेच्या गेस्ट रूम कडे जाण्याचा रस्ता शोधत होते.पण रस्ता सापडत नव्हता,वर मुसळधार पाऊसामुळे सर्वजण गारठलो होतो.बराच वेळ आम्ही राजसभा,होळीचा माळ याच परिसरात भटकत होतो.आमच्याकडे दोन बॅट-या होत्या पण त्याचा काही उपयोग होत नव्हता.कारण इतके दाट धुके होते,की अगदी जवळचे दिसत नव्हते ,शेवटी आम्ही महादरवाज्याजवळ  थांबण्याचा निर्णय घेतला.  आठ वाजून गेले होते,सर्वांची अवस्था बिकट

रायगडावर रस्ता शोधणारे मावळे 
झाली होती,एकतर सर्वजण नखशिखांत भिजले होते वर सोसाट्याचा वारा ,मुसळधार पाऊस व दाट धुके सोबतीला होते.बराच वेळ निघून गेला साडेआठ वाजून गेले,गडावर पुरातत्व खात्याचे कर्मचारी आम्हास सुरूवातीला भेटले होते,परत माघारी येऊन आम्ही त्यांचा शोध घेतला,शेवटी तो कर्मचारी आमचा आवाज ऐकून आमच्या दिशेने आला.त्याला आम्ही आमच्या परिस्थितीची कल्पना दिली.त्याने आम्हास रोपवेच्या गेस्ट रूम कडे नेण्याचे कबूल केले.
आमची कोंदट रूम
अखेर आम्ही गेस्ट रूम मध्ये पोहचलो.त्या कर्मचा-याला शंभर रूपये देऊन आम्ही त्याचे आभार मानले.गेस्ट रूम पाहिल्यावर सर्वजण उडालेच,अतिशय कोंदट अशी जागा वर पत्र्याचे शेड पण आमच्याकडे इलाज नव्हता. आम्हा सर्वांनी, सामान ठेऊन,कपडे बदलून गेस्ट रूमच्या उपहारगृहामधील पिठलं-भाकरी खाल्ली ज्याची ऑर्डर चढाई चालू करण्यापूर्वी आम्ही दिली होती.पेटपुजा झाल्यानंतर ऑफिसमधल्या गप्पा-गोष्टी करून सर्वांनी वामकुक्षी करण्याचा निर्णय घेतला कारण सर्वजणच खूप थकले होते.मुसळधार पाऊस पत्र्याच्या शेडावर पडत असल्यामुळे आवाज जोरात येत होता याउपर सोसाट्याचा वा-याचा आवाज त्यामुळे झोप काही येत नव्हती,ब-याच वेळानी झोप लागली.मध्यरात्री जाग आली म्हणून मी टॉर्चचा प्रकाश मारला तर धक्काच बसला,उंदीर मामा आमच्या सर्वांच्या अंगावर निवांतपणे खेळत होते.उंदरामुळे मला रात्रभर झोप लागली बाकीचे कसे झोपले देव जाणे.पहाटे-पहाटे मला डोळा लागला.
राजसभेतील छत्रपतींचा पुतळा
सकाळी उठल्यावर सर्वांना उंदराचे प्रताप कळाले.संकेतला उंदीर चावला होता,त्यामुळे त्याचा पाय थोडासा सुजला होता.संकेत व मयुरची पॅंट व बॅगा उंदराने कुरतडल्या होत्या.तर रात्रभर मला झोप न लागल्यामुळे माझ्या डोळ्यात रक्त आले होते.आंघोळ केल्यानंतर चहा घेऊन रेनकोट घालून आम्ही बाहेर पडलो कारण बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.एक गाईड ठरवून आम्ही किल्ला पाहावयास सुरूवात केली.मुसळधार पाऊस,सकाळचे आल्हाददायक वातावरण व दाट धुक्यामुळे गडाचे सौंदर्य वेगळेच भासत होते.दाट धुक्यात हरवलेल्या दगडी इमारती,पावसामुळे ठिकठिकाणी उगविलेले हिरवेगार गवत याचे वर्णन काय करावे.गाईड तरूण असल्यामुळे जास्त उत्साही होता.रायगडावरील एकेक प्रसंग सांगताना तो हरवून जाई.राजसभेतल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन करून आम्ही महादरवाज्यातून बाहेर पडलो.होळीच्या माळ परिसरातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ बसून त्याकाळतील प्रसंग आठवू लागलो.

छत्रपतींची समाधी
याच परिसरात छत्रपतींवर हल्याचा प्रयत्न झाला होता. बाजारपेठ, राणीमहाल, नगारखाना, गंगासागर तलाव आदि ठिकाणे पाहून आम्ही जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो. जगदीश्वराच्या मंदिरात छत्रपतींच्या नावाचा जयजयकार करून आम्ही छत्रपतींच्या समाधी जवळ येऊन आपला माथा टेकला.याच ठिकाणी आम्ही बराच वेळ बसून होता. जगदीश्वराचे मंदिराच्या बाहेरील हिरोजी इंदूलकराचा शिलालेख पाहून आम्ही गाईडच्या घरी गेलो.त्याने आम्हास गरमागरम भजी व चहा दिला.त्याचे पैसै देऊन आम्ही गेस्ट रूम वर परत  आलो.सोबतच्या बॅगा घेऊन रायगडावर परत येण्याचा निर्धार करून आम्ही रोपेवेत बसलो.रोपवेने येतेवेळी आम्हास विराट अशा रायगडाच्या दरीचे दर्शन झाले.येतेवेळी रोपवेतूनच छायाचित्रे घेत शेवटी आम्ही रायगडाचा पायथा गाठला.व खटारा टाटासुमो मध्ये बसून पुण्याच्या दिशेने धावू लागलो.